महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक...
देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत. नियतीच्या आघाताने खचून जाणे , हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण ; परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार, आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांचा पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या विरंगणेचा हा परिचय तुम्हांला निश्चितच प्रेरक ठरेल.
महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा, 'भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना' असा प्रवास अत्यंत धाडसी , प्रेरक आणि थक्क करणारा आहे.
![]() |
| ।।स्वाती संतोष महाडिक।। |
शिवाजी विद्यापीठातून बी. एससी व एम. एस. डब्ल्यु अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती . दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री. संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी बी. एड आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. साडेबारा वर्षांच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची दोन अपत्ये. कर्नल संतोष महाडीक यांचे पाहिले प्रेम म्हणजे 'भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. ' याची जाणीव स्वाती महाडीक यांनाही होतीच. भारतीय सैन्यदलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक...17 नोव्हेम्बर , 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालीयनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवादी यांबरोबर निकराने लढा देताना वीरमरण आले.
नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या चाळीशीच्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चय पूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अँकॅडमी , चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी अकरा महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले . त्या वेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही सातवीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता दुसरीत शिकत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्यदलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे , तर देशातील प्रत्येक स्त्री , प्रत्येक मूल यांच्या समोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्द्ल त्यांचे आईवडील, सासरचे मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. "स्वाती लहानपासूनच धाडसी होती",असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षणक्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी , अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते ; परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैण्यात भरती होऊन, पतीचे ' पाहिले प्रेम ' जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या ' दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार ! ' हा स्वतीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे, जिद्दीचे मूर्त रूप आहे.खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही. उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येने कठीण होते , असे त्या म्हणतात .
मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्वाचे वाटते , कारण त्यांच्या मते , एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते . जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, "आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे". "तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्वाचे आहे". निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे.
आपण जे काम करतो, मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं , अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचे असते , असे त्या म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रीयांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात .
पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरंगणेला सादर प्रणाम !












